वाईतील सिध्दनाथवाडीतील न्यास शिवाजी खरात हा १७ वर्षीय शाळकरी पोरगा कालपासून बेपत्ता होता, आज तो आढळला, पण असा की, डोक्याचेच तुकडे करून टाकल्याने ओळखही पुसून टाकण्याइतपत त्याची अवस्था करून टाकली आहे.
सातारा : वाईतील सिध्दनाथवाडीतील न्यास शिवाजी खरात हा १७ वर्षीय शाळकरी पोरगा कालपासून बेपत्ता होता, आज तो आढळला, पण असा की, डोक्याचेच तुकडे करून टाकल्याने ओळखही पुसून टाकण्याइतपत त्याची अवस्था करून टाकली आहे. अज्ञातांनी कोयत्याने डोक्यात सपासप वार करुन अमानुषपणे त्याची हत्या केली आहे. या घटनेने वाई सुन्न झाली असून वाई शहरात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी शितल जानवे खराडे, वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलिस निरिक्षक रवींद्र तेलतुंबडे, पाचगणीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सतीश पवार, महिला फौजदार सोमदे व पोलिस कर्मचारी उपस्थित आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी डॉगस्कॉड व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.
न्यास हा तरुण वाईच्या सिध्दनाथवाडीतील रहिवासी. तो १२ वीचे शिक्षण घेण्यासाठी शिरवळ येथे जात होता. पोलीस व लष्कर भरतीसाठी वाई येथे तो प्रशिक्षण घेत होता. रात्री १० वाजल्या पासून तो घरातुन बेपत्ता झाला होता. याची माहिती वाईचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना समजताच त्यांनी त्याचा मोबाईल लोकेशनचा आधार घेत शोध मोहीम सुरू केली होती.
अखेर पहाटेच्या दरम्यान धोम धरणाच्या उजव्या कालव्याच्या डाव्या बाजूकडे मधुकर चौधरी यांच्या शेतजमीनीत डोक्याचे तुकडे केलेल्या अवस्थेत न्यास याचा मृतदेह आढळून आल्याने आईसह कुटुंबियांचा आक्रोश पाहून उपस्थित नागरिकांच्या अश्रूंचे बांध फुटले. खूनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.


