साखर कारखान्यांच्या आर्थिक लुटीची विभागीय आयुक्तांकडे तक्रार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुन्हा आंदोलनाचा इशारा
सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 2021-22 मध्ये सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून गाळप हंगामात गेलेल्या गैर कारभाराविरुद्ध चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 2021-22 मध्ये सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून गाळप हंगामात गेलेल्या गैर कारभाराविरुद्ध चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. विभागीय आयुक्तांकडे संघटनेच्यावतीने लेखी पत्राद्वारे तक्रार करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी ही माहिती दिली.
संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे की, यंदाच्या गळीत हंगामात वाई येथील किसन वीर आणि खंडाळा सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकर्यांचा ऊस उशिरा गेला. ऊस पिकांचे नुकसान होऊन त्याचे वजन घटले. तोडणीचे एकरी पैसे मागून कारखाना संचालकांच्या वतीने कामगारांची लूट केली गेली. कारखाना कार्यस्थळावर पहिल्या दिवसापासून किती उस गाळप केला ? ऊस वाहतूक करणार्या वाहनांनी किती उस नेला, शेतकर्यांच्या खात्यात जमा केलेली ऊस बिले, ऊस तोडणी कामगारांच्या कामाचा झालेला हिशोब या मुद्यांच्या संदर्भाने सर्व कागदपत्रांची विभागीय आयुक्तांनी चौकशी करावी. ऊस दर नियंत्रण 1966 31 प्रमाणे काही कारखान्यांनी या नियमांचा भंग केला आहे. कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखाना यांनी दोन-तीन महिने शेतकर्यांची बिले दिली नाहीत. तसेच सातारा जिल्ह्यातील इतर कारखाने अशा पद्धतीने काम करत आहेत. येथील शेतकर्यांना विलंब व्याजासह तातडीने मुद्दल परतावा देण्यात यावा. ज्यांचा सत्ताधारी पॅनेलला पाठिंबा आहे त्याच शेतकर्यांचा ऊस गाळपासाठी नेला जात आहे. याचे पुरावे व तक्रार वेळोवेळी सादर करण्यात आलेले आहेत. मात्र यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई होत नाही, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तक्रार आहे. जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी गाळप हंगामास उशीर झाल्यामुळे शेतकर्यांना 15 टक्के दराने विलंब व्याज दिले नाहीत. ते व्याज तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी राजू शेळके यांनी केली आहे.


