महाराष्ट्र केसरी च्या आखाड्यातील विजेत्या मल्लांना मिळणार तेहतीस लाखाचे मानधन
माती आणि गादी गटामध्ये प्रथम क्रमांकाला 60, तर द्वितीय क्रमांकाला 55 हजार आणि तृतीय क्रमांकाला 50 हजाराचे बक्षीस
तब्बल 61 वर्षांच्या कालखंडानंतर महाराष्ट्र केसरीचा फड साताऱ्याच्या छत्रपती शाहू क्रीडा संकुलामध्ये मंगळवार पासून रंगणार आहे. या तालमी मध्ये तब्बल 900 मल्ल 45 संघामधून एकमेकांशी झुंजणार असून गादी आणि माती विभागातील वजन 57 ते 125 किलो च्या गटांमध्ये विजेत्यांना तब्बल 33 लाख रुपयांचे मानधन दिले जाणार आहे.
सातारा : तब्बल 61 वर्षांच्या कालखंडानंतर महाराष्ट्र केसरीचा फड साताऱ्याच्या छत्रपती शाहू क्रीडा संकुलामध्ये मंगळवार पासून रंगणार आहे. या तालमी मध्ये तब्बल 900 मल्ल 45 संघामधून एकमेकांशी झुंजणार असून गादी आणि माती विभागातील वजन 57 ते 125 किलो च्या गटांमध्ये विजेत्यांना तब्बल 33 लाख रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याचा क्रीडा विभाग सातत्याने संकुलात तयारीमध्ये असून जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी तब्बल बारा विभागांमध्ये यजमान पदाची जबाबदारी जिल्हा तालीम संघ व महाराष्ट्र कुस्ती फेडरेशनच्या माध्यमातून उत्तमरित्या सांभाळली आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनाचे मुक्काम स्थळ सातारा ठरल्यानंतर छत्रपती शाहू क्रीडा संकुल आला नवीन झळाळी मिळाली आहे. यामध्ये जिल्हा तालीम संघ आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने महाराष्ट्र केसरीच्या यजमान पदाची मजबूत तयारी सध्या सुरू आहे. या तयारीमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक आणि त्यांची 12 कर्मचाऱ्यांची टीम गेले चार दिवस सातत्याने राबत असून त्यांच्या देखरेखी अंतर्गत सर्व तयारी काळजीपूर्वक केली जात आहे. या तयारीचा आढावा पालक मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार, निमंत्रक सुधीर पवार आणि दिपक पवार सातत्याने घेत आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यातून तब्बल पन्नास हजाराहून अधिक क्रीडा शौकिन आणि कुस्तीपटू येतील, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे. मात्र 45 संघातून 1136 मल्ल पाच आखाड्यामध्ये एकमेकांशी झुंजणार आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा तालीम संघ व सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्याकडे यजमान पदाची मोठी जबाबदारी आहे. यामध्ये निवास व्यवस्था, पाणी व्यवस्था, विद्युत व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, क्रिडांगण व्यवस्था, प्रेक्षक बैठक व्यवस्था, भोजन व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, स्पर्धा प्रसिद्धी, सुरक्षाव्यवस्था आणि उद्घाटन पारितोषिक समारंभ अशा बारा विभागामध्ये जिल्हा क्रीडाधिकारी विभाग समाविष्ट असून युवराज नाईक आणि जिल्हा तालीम संघाचे समन्वयक सुधीर पवार यांनी संयुक्त सहकार्याने या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
निवासी संघांना बॅडमिंटन कोर्ट इमारत, रयत शिक्षण संस्थेच्या काही इमारती, छत्रपती शाहू स्टेडियम समोरील धंदेवाईक शिक्षण शाळा, पोवाई नाक्यावरील महाराजा सयाजीराव विद्यालय याशिवाय माजी सैनिक मुलांचे वसतिगृह येथे त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या चांदीच्या गदेसह गादी आणि माती गटातील विजेत्या मल्लांना 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97, 125 वजनी गटांमध्ये रोख बक्षिसे आहेत. दोन्ही विभागांमध्ये पहिल्या तीन विजेत्यांना रोख स्वरूपात ते मानधन दिले जाणार आहे प्रथम क्रमांकाला 60000, द्वितीय क्रमांकाला 55, तर तृतीय क्रमांकाला 50 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यामुळे कुस्त्यांचा थरार जंगी असणार असून पाच जिल्ह्यातून तब्बल 55 हजार कुस्ती शौकीन आणि मल्ल या आखाड्यासाठी दाखल होतील, असा विश्वास सुधीर पवार यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद आणि समन्वयक सातारा जिल्हा तालीम संघ यांच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरीची ही स्पर्धा पार पडत आहे. मात्र अगदी घरचं आमंत्रण असल्याप्रमाणे एक नैतिक जबाबदारी म्हणून जिल्हा प्रशासनाच्या क्रीडा विभागाने छत्रपती शाहू क्रीडा संकुलाच्या अद्ययावतीकरणासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, सहाय्यक क्रीडा अधिकारी, येथील कर्मचारी यंत्रणा गेले चार दिवस सातत्याने विविध कामांसाठी राबताहेत. गेल्या दोन दिवसापासून युवराज नाईक हे क्रीडा संकुलावरच मुक्कामी असून मल्लांच्या स्वागतासाठी कोठेही काही कमी पडणार नाही, याची जातीने काळजी घेत आहेत. जिल्हा क्रीडा समितीचे सचिव जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीसुद्धा आपले व्यस्त वेळापत्रक बाजूला ठेवून महाराष्ट्र केसरी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे. मैदानावर होणाऱ्या सर्व बारीक सारीक कामांची स्वतः बारकाईने पाहणी करून त्याचे योग्य नियोजन मार्गी लावून त्याची संपूर्ण माहिती ते पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कळवत आहेत. मंगळवार दिनांक 5 रोजी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत रंगतदार पद्धतीने होणार आहे. मात्र महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम आखाडा दिनांक 9 रोजी असून मानाची गदा कोण पटकावणार, याची खरी उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे. ही मानाची गदा देण्यासाठी दस्तुरखुद्द राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विकास आघाडीतील अनेक नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.


