maharashtra

जिल्हा बँकेतील अंतर्गत सेवकांच्या बदल्यांमुळे अस्वस्थता

ठराविक टेबलचे कर्मचारी बदलणार केव्हा?

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अंतर्गत बदल्यांचे सत्र सुरू झाले असून मुख्य कार्यालयामध्ये सुमारे अडीचशे ते तीनशे सेवकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्या विभाग अंतर्गत करण्यात आल्या असून यामध्ये तोंड बघून बदल्या झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये वाढती अस्वस्थता आहे.

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अंतर्गत बदल्यांचे सत्र सुरू झाले असून मुख्य कार्यालयामध्ये सुमारे अडीचशे ते तीनशे सेवकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्या विभाग अंतर्गत करण्यात आल्या असून यामध्ये तोंड बघून बदल्या झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये वाढती अस्वस्थता आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार म्हणजे एकेकाळी चिरेबंदी वाडा होता. मात्र आता बँकेत जरा काही खट वाजले की लगेच त्याची चर्चा सुरू होते. जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्यापासून एक संचालक आणि त्याच्या मागे उभी असणारी कर्मचारी-अधिकारी यांची लॉबी असे सत्र सुरू झाले आहे. असे लॉबिंग संचालकांकडून सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्येच गटबाजी सुरू झाल्याची चर्चा आहे. या गटबाजीच्या चर्चेचे निमित्त म्हणजे कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत होणाऱ्या बदल्या. आठ दिवसापूर्वी बदल्यांचे सर्क्युलर सामान्य प्रशासन विभागाने काढल्याने बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
 मुख्य कार्यालयातच अचानक बदली सत्र सुरू झाल्याने सर्वांच्या आश्चर्याने भुवया उंचावल्या आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये व्यवहारसौजन्य राहिले नसल्याची तक्रार असून अंतर्गत अरे-तुरे पद्धतीमुळे वादावादीचे प्रसंग घडत आहेत. बँकेच्या ठराविक टेबलचे कर्मचारी मात्र कधीच बदलले जात नाहीत. यामध्ये प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यांना वरदहस्त असल्याने त्यांच्या बदल्या होत नाहीत. हे सर्व कर्मचारी आणि संचालक म्हणूनच बँक चालवतात. विकास सेवा सोसायटीची लॉबीसुद्धा याच पद्धतीने ऑपरेट होते, असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.
काही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी या विषयासंदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नोकरीच्या भीतीपोटी कोणीही शब्द उच्चारला नाही. शाखाप्रमुख, कॅशियर, क्लार्क आणि शिपाई अशा अडीचशे ते तीनशे कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्या त्या मागचे नक्की गौडबंगाल काय आहे, हे अद्यापही समजायला मार्ग नाही. सामान्य प्रशासनाने कामाच्या सोयीसाठी प्रशासकीय बदलांचे गोंडस कारण दिले आहे. मात्र ठराविक ठिकाणी टेबलशी सुरू झालेले लागेबांधे तोडण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. मात्र विशिष्ट विभागाचे आणि टेबलच्या कर्मचाऱ्यांना यामधून का वगळण्यात आले आहे, असा कर्मचाऱ्यांचा कळीचा प्रश्न असून त्यावर कोणीही बोलायला तयार नाही. बँकेमध्ये प्रयोगशील आणि चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असून यामागे काही ठराविक सुपीक अधिकाऱ्यांचा ब्रेन चालत असल्याने या सर्व समस्यांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे काय मार्ग काढणार, हा खरा संशोधनाचा विषय आहे.