खोटी ॲट्रॉसिटी व गावावर दहशत निर्माण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा
ढाकणी ग्रामस्थांची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
खोटी ॲट्रॉसिटी व गावावर दहशत निर्माण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ढाकणी, ता. माण येथील ग्रामस्थांची जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सातारा : खोटी ॲट्रॉसिटी व गावावर दहशत निर्माण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ढाकणी, ता. माण येथील ग्रामस्थांची जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. अधिकराव सुखदेव कांबळे, भानुदास सतु कांबळे व त्यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक नागरिकांविरुद्ध खोट्या जातीवाचक तक्रारी करून खोटे गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
ढाकणी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ढाकणी, ता. माण येथील अधिकराव कांबळे हा अधिकृतरित्या आरोग्य सेवक या पदावर काम करीत असून तो स्वतः कामावर हजर न राहता त्याच्या ऐवजी त्याचा चुलत भाऊ दिपक भानुदास कांबळे, किरण भानुदास कांबळे हे दोघे त्या ठिकाणी आळीपाळीने काम करतात. अधिकराव कांबळे हे दोन्ही चुलत भावाच्या मदतीने शासकीय अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून खंडणी स्वरूपाची बेकायदेशीर कामे करून घेतात. ते अनुसूचित जाती जमातीचे असल्याचा गैरफायदा घेऊन स्थानिक नागरिकांना नाहक त्रास देणे, त्याला कोणी विरोध केल्यास त्यांच्यावर ॲट्रॉसिटी सारखे खोटे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची दहशत निर्माण करून त्यांना ब्लॅकमेल करणे, त्यांच्या जमिनीचा अनधिकृतपणे ताबा घेणे मारहाण करणे असे प्रकार करत असल्यामुळे गावामध्ये दहशत निर्माण झाली आहे. अधिकराव यांनी शेतकरी असल्याचे बनावट कथने करून तहसीलदार यांच्या समोर खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून म्हसवड, ढाकणी व इतर ठिकाणी शेत जमिनी खरेदी दस्त नोंदवलेले आहेत. त्याची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.
अशाच प्रकारे ढाकणे येथील सुखदेव सतु कांबळे व भानुदास सतु कांबळे हे स्वतः व त्यांच्या कुटुंबीयांकडून निर्माण करण्यात आलेल्या दहशतीने नागरिक त्रस्त झाले आहेत. जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. त्यामुळे अधिकराव सुखदेव कांबळे आणि भानुदास सतु कांबळे व त्यांच्या कुटुंबीयांनी खोट्या जातीवाचक तक्रारी करून दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर नानासो पांडुरंग खाडे, धनराज अर्जुन खाडे, धैर्यशील वामन खाडे, विजय मल्हारी खाडे, अशोक हरिबा ओंबासे, शंभूराज सुभाष खाडे, मोहन जगन्नाथ वाघमारे, कमल आनंद कांबळे, आनंद श्रीपती कांबळे, मोहन शामराव कांबळे, सौ. रंजना मोहन कांबळे, आप्पासो दशरथ शिंदे, गणपत नथु शिंदे, मंगल मल्हारी खाडे, प्रवीण मोहन कांबळे, मंगल छगन ओंबासे, उत्तम केरु ओंबासे आदींच्या स्वाक्षरी आहेत.


