maharashtra

कास पठारावर हवाई पट्टी उभारण्याची खासदार उदयनराजे यांची मागणी

केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची उदयनराजे यांनी दिल्लीत घेतली भेट

MP Udayanaraje's demand to build an airstrip on Kas Plateau
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पाचगणी व जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेले कास पठार येथे महाराष्ट्रातील 35 ते 40 लाख पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. या पर्यटनाला उत्तेजन देण्यासाठी कास पठार परिसरात छोटी हवाई पट्टी उभारण्यासंदर्भात केंद्राच्या विमान उड्डाण मंत्रालयाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली.

सातारा : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पाचगणी व जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेले कास पठार येथे महाराष्ट्रातील 35 ते 40 लाख पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. या पर्यटनाला उत्तेजन देण्यासाठी कास पठार परिसरात छोटी हवाई पट्टी उभारण्यासंदर्भात केंद्राच्या विमान उड्डाण मंत्रालयाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली. यासंदर्भातील चर्चेचा विस्तृत तपशील खासदार उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिला आहे.
या प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे की कास पठार येथे छोटी हवाई पट्टी उभारण्या संदर्भात कार्यवाही सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही ज्योतिरादित्य शिंदे यांनी चर्चेनंतर दिली आहे. सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक स्थळांचा आणि पर्यटनाचा वारसा लाभला आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कास येथे 35 ते 40 लाख पर्यटक दरवर्षी भेट देतात. यामध्ये गतिमानता आणण्यासाठी कास पठार परिसरात योग्य जागा शोधून तेथे एक छोटी हवाई पट्टी उभारण्या संदर्भात मागणी करण्यात आली होती. याची लवकरच तज्ञांच्या पथकाद्वारे पाहणी करून तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले आहे.
खासदार उदयनराजे भोसले आणि  मंत्री ज्योतिरादित्य  शिंदे यांची भेट आज दिल्ली येथे झाली. यावेळी झालेल्या चर्चेत अनेक विकासाच्या मुद्द्यावर भर देण्यात आला. सातारा जिल्ह्यातील उत्तर पश्चिम भागातील स्थळांना भेट देण्यासाठी रस्ते वाहतुकीचा उपयोग होतो. मात्र त्याला हवाई वाहतुकीची जोड दिली तर भेट देणाऱ्या व्यक्तींचा वेळ वाचणार असून पर्यटक सुद्धा अधिक अधिक आकर्षित होणार आहेत. .सातारा जिल्ह्याचा औद्योगिक आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक वेगळा दर्जा आहे. या दृष्टिकोनातून कास पठार येथे हवाई पट्टी उभारण्यासंदर्भात मागणी करण्यात आल्याचे उदयनराजे यांनी स्पष्ट केले आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कोयना, उरमोडी, धोम बलकवडी  अशी मोठी धरणे आहेत. त्यामुळे या धरणांमध्ये सी प्लेन धावपट्टी उभारता येईल का, याची सुद्धा चाचणी होणे गरजेचे आहे. सध्या घाटाई ते कास ते महाबळेश्वर नवीन रस्ता अस्तित्वात आला आहे. रस्ते वाहतुकीबरोबर अन्य वाहतूक सुरू होणे ही सुद्धा सातारा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी घटना आहे. या विविध प्रश्नांवर ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याचे उदयनराजे यांनी सांगितले. किल्ले अजिंक्यतारा, किल्ले प्रतापगड आणि सज्जनगड येथे रोप वे उभारण्याचा प्रस्ताव यापूर्वीच नितीन गडकरी यांच्या रस्ते विकास मंत्रालयाला देण्यात आला आहे. या प्रस्तावाची छाननी सुरू असून नजीकच्या काळात ये तिन्ही रोपवे उभारले जाणार आहेत. कास येथे हवाई पट्टी बांधल्यास पर्यटक भाविक नागरिकांचा वेळ वाचून त्यांना सुखकर पर्यटनाचा आनंद मिळणार आहे आणि सातारा जिल्ह्याच्या विकासाला नव्या पर्यटन पूरक व्यवसायांमध्ये वाढ होईल. केंद्राच्या उडान योजनेअंतर्गत एअर स्ट्रीप बांधण्याबाबत प्रस्तावित करण्यात आला आहे. सर्वांच्या सहकार्याने ही महत्त्वाची योजना लवकरच पूर्णत्वाला जाईल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.