maharashtra

पुणे येथील 14 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ भारत पाटणकर यांची निवड


नवा समृद्ध पर्यावरण संतुलित समाज निर्माण करू पाहणार्‍या लढ्यातील एक नेतृत्व असलेले डॉ भारत पाटणकर यांची पुणे येथे होणार्‍या 14 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

सातारा : महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराचे जेष्ठ नेते व विचारवंत, साहित्यिक तसेच वर्गीय, जातीय आणि लैंगिक शोषणाचा अंत करून नवा समृद्ध पर्यावरण संतुलित समाज निर्माण करू पाहणार्‍या लढ्यातील एक नेतृत्व असलेले डॉ भारत पाटणकर यांची पुणे येथे होणार्‍या 14 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
येत्या दि 10 व 11 डिसेंबर 2022 रोजी साने गुरुजी स्मारक, पुणे येथे होणार्‍या 14 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी ही निवड करण्यात आली आहे.
संयोजन समितीचे निमंत्रक साथी नितीन पवार, आयु. मानव कांबळे, कॉ लता भिसे, कॉम्रेड मेधा थत्ते, तमन्ना इनामदार, विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र चे कार्याध्यक्ष कॉ धनाजी गुरव, सरचिटणीस कॉ जालिंदर घीगे, उपाध्यक्ष कॉ. विजय मांडके व प्रा. गौतम काटकर यांनी ही माहिती दिली.
डॉ भारत पाटणकर यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार नाना पाटील, हिंदू की सिंधू?, मुद्दा आहे जग बदलण्याचा. मुक्त अर्थव्यवस्था आणि वर्गीय, जातीय, लैंगिक शोषण, महात्मा फुले आणि सांस्कृतिक संघर्ष, पर्यायी विकास निती, तसेच कविता झेपावणार्‍या पंखाची ( कविता संग्रह), इत्यादी 24 मराठी पुस्तके लिहिली असून त्यांच्या सहचारिणी डॉ गेल ऑम्व्हेट यांच्या सह त्यांनी सॉंग्ज ऑफ तुकोबा या नावाचे इंग्रजी पुस्तकही लिहिले आहे प्रस्थापित ब्राह्मण्यवादी, भांडवली पुरुषसत्ता व्यवस्थेविरुद्ध विद्रोही संस्कृतिक चळवळ महाराष्ट्र काम करीत आहे. डॉ भारत पाटणकर यांची अध्यक्षपदी निवड करताना संयोजन समितीला आनंद होत आहे. कारण महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीत डॉ. भारत पाटणकर यांचा सहभाग आणि योगदान महत्त्वाचे राहिले आहे. क्रांतिबा फुले सांस्कृतिक मंच स्थापन करण्यात पुढाकार घेऊन मुंबईमध्ये जातीव्यवस्था विरोधी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम डॉ भारत पाटणकर यांनी संघटित केले होते. मुंबईत कामगार चळवळीत सक्रिय असताना सडक नाटक चळवळीत सुद्धा डॉ पाटणकर हे अग्रभागी राहिले आहेत. त्याचबरोबर प्राच्यविद्यापंडित कॉ शरद पाटील यांच्या पुढाकाराने उभ्या राहिलेल्या दलित, आदिवासी, ग्रामीण. साहित्य सभेच्या स्थापनेत सुद्धा डॉ भारत पाटणकर यांचा सहभाग राहिला आहे. या चळवळीच्या वतीने अनेक दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्य संमेलने यशस्वी करण्यात आली आहेत. आणि त्यात त्यांचा सहभाग महत्त्वाचा राहिला आहे. विशेष म्हणजे विसावे शतक सरत असताना महाराष्ट्रात उभे राहिलेले विद्रोही नावाचे वादळ जन्माला घालण्यास इतर अनेकांच्या बरोबर डॉ भारत पाटणकर यांची भूमिका निर्णायक राहिली आहे. मुंबईच्या धारावी मध्ये झालेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या नियोजनात त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या स्थापनेतही त्यांनी तितक्याच समर्थपणे भाग घेतला आहे. आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीची भूमिका ठरवण्यात, तिला तात्विक पाया आणि नवी सांस्कृतिक ओळख देण्यास डॉ. भारत पाटणकर यांचे वैचारिक योगदान महत्त्वाचे राहिले आहे. डॉ भारत पाटणकर यांना आई-वडिलांकडून लढण्याचा वारसा मिळाला आहे क्रांतिवीरांगना इंदुताई पाटणकर आणि क्रांतिवीर बाबूजी पाटणकर या सातारच्या प्रति सरकारमधील सक्रिय असलेल्या दांपत्याचा हा एकुलता एक मुलगा. एमबीबीएस चे शिक्षण झाल्यानंतर एमडी चे शिक्षण घेत असताना डॉ भारत पाटणकर हे श्रमिकांच्या चळवळीत ओढले गेले. मागोवा या क्रांतिकारक गटात ते सक्रिय झाले. डॉक्टरकीची पदवी असली तरी पूर्ण वेळ कार्यकर्ता होण्याचा निर्धार केल्याने पुढे आयुष्यात एकही दिवस प्रॅक्टिस केली नाही 1973 ते 76 या काळात मुंबईत ते कामगार संघटनात सक्रिय राहिले. सांगली जिल्ह्यातील मुक्ती संघर्ष चळवळीच्या माध्यमातून दुष्काळ निर्मूलनाची चळवळ जनपर्याय मांडून त्यांच्या प्रस्थापनेसाठी लढे संघटित करण्याची रीत महाराष्ट्रात प्रथमच सुरू करण्यात एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून त्यांचा सहभाग महत्त्वाचा राहिला आहे. बळीराजा स्मृती धरण हा या चळवळीचा भाग म्हणून ओळखला जातो. याच संघर्षातून समन्यायी पाणी वाटप, पर्यायी शेती दुष्काळ निर्मूलनाचे नवे क्रांतिकारक धोरण पुढे आले आणि क्रांतिवीर नागनाथ नायकवडी यांच्या सोबतीने पश्चिम महाराष्ट्रातील तेरा दुष्काळी तालुक्यात पाणी संघर्ष चळवळ उभी केली. त्याचबरोबर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सुद्धा त्यांनी महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषद तसेच श्रमिक मुक्ती दल यांच्या माध्यमातून काम केले आणि अनेक धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न व जमिनीला पाणी द्यावयाचे प्रश्न मार्गी लावले. दि. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेली आणि हिंदू मुस्लिम असे एकमेकांविरुद्ध तणावाचे वातावरण तयार झाले. त्यावेळी या विरोधात स्पष्ट भूमिका घेऊन जातीयवादी धर्मांध शक्तींचा बिमोड करण्यासाठी कष्टकरी जनतेला रस्त्यावर उतरून बिमोड दिन साजरा करण्यात डॉ. भारत पाटणकर यांचा सहभाग महत्त्वाचा राहिला. हिंदू की सिंधू या पुस्तिकेतून या लढ्याला वैचारिक पाया देत धर्मांध शक्तीला उघडे पाडण्याचे काम डॉ भारत पाटणकर यांनी केले. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने पुण्यात गुजरात मधील 2002 सालच्या नरसंहारच्या विरोधात छ. शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात गुजरात होऊ देणार नाही अशी भूमिका घेत विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने पुण्यामध्ये महात्मा फुले वाड्यासमोर एल्गार मोर्चा संघटित केला व धर्मांधता विरोधी परिषद आयोजित केली. यातूनच हिंदी है हम हिंदोस्ता हमारा या चळवळीचा जन्म झाला. विद्रोही सांस्कृतिक चळवळ तसेच विठोबा रुक्माई मंदिर मुक्ती आंदोलन यांच्या वतीने बडवे उत्पादन आंदोलन सुरू केले त्याचे नेतृत्वही डॉ भारत पाटणकर यांनी केले होते. पुढे श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली विठोबा रखुमाई मुक्ती आंदोलन उभे करून पुरुषसूक्ताने होणारी विठ्ठलाची पूजा बंद करावी यासाठी भूमिका घेऊन आंदोलन सुरू करण्यात आले. यातही डॉ. भारत पाटणकर यांचा सहभाग महत्त्वाचा राहिला आहे. जाती व्यवस्थेचा अंत केल्याशिवाय भारतात समग्र क्रांती होणार नाही अशी भूमिका घेत डॉ. भारत पाटणकर यांनी जाती व्यवस्थेचा अंत या पुस्तकातून जातीअंताची ठोस भूमिका मांडली. केवळ भूमिका मांडून न थांबता त्या दिशेने पावले उचलण्यासाठी सत्यशोधक शेतकरी श्रमिक संघटना आणि श्रमिक मुक्ती दल यांच्या संयुक्त विद्यमाने जातीय अंताच्या परिषदा संघटित केल्या. सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ स्थापन करण्यातही त्यांचा पुढाकार महत्त्वाचा राहिला आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरातून पुजारी हटवण्याचा निर्णय राज्य सरकारला घेण्याच्या संदर्भात जे आंदोलन झाले. त्यातही डॉ. भारत पाटणकर यांचा गणमाता अंबाबाई मुक्ती आंदोलन सुरू करण्यात महत्त्वाचा वाटा होता. अंबाबाईच्या समग्र मुक्तीची लढाई अजून सुरूच आहे. डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्त, दुष्काळग्रस्त, पवनचक्कीग्रस्त यांची आंदोलने सुरूच आहेत. आणि ती निर्णायकी टप्प्यावर आलेली आहेत. त्याचबरोबर सेझ विरोधी लढा त्यांनी अलिबाग परिसरात दिला. डॉ. भारत पाटणकर यांच्या या चळवळीमध्ये आणि संघर्षात त्यांच्या पत्नी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधक, समाजशास्त्रज्ञ स्मृतीशेष डॉ गेल ऑम्व्हेट उर्फ शलाका पाटणकर यांचीही भक्कम साथ त्यांना लाभली.  
अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून त्यांनी आपले प्रबंध सादर केले आहेत. त्यांना बाबुराव बागुल गौरव पुरस्कार दलित मित्र पुरस्कार अरुण लिमये स्मृती युवा पुरस्कार, सामाजिक कृतज्ञता पुरस्कार आदी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे सांस्कृतिक क्षेत्रात एक भूमिका घेऊन काम करणार्‍या विचारवंत कार्यकर्त्याचा तसेच चळवळीचा सन्मान आहे असे पुणे येथे होणार्‍या 14 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या संयोजन समितीला वाटते असे प्रतिपादन संयोजन समितीचे निमंत्रक साथी नितीन पवार, आयु. मानव कांबळे, कॉ लता भिसे, कॉ मेधा थत्ते, तमन्ना इनामदार, तसेच विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष कॉ धनाजी गुरव, सरचिटणीस कॉ जालिंदर घीगे उपाध्यक्ष कॉ विजय मांडके व प्रा. गौतम काटकर यांनी म्हटले आहे.