maharashtra

पुण्यात बिबट्यांचा उच्छाद! शेतकऱ्यांमध्ये भीती, महिलांचे शेतात गळ्याला पट्टा बांधून काम


Leopards swarm in Pune! Fear among farmers, women work in the fields with belts tied around their necks
पुणे जिल्ह्यातील काही भागात बिबट्यांच्या दहशतीनं जगणं कठीण झालं आहे. स्थानिक नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.

पुणे जिल्ह्यातील काही भागात बिबट्यांच्या दहशतीनं जगणं कठीण झालं आहे. स्थानिक नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. जीव मुठीत धरून लोक घराबाहेर पडत आहेत. शेतमजूर महिला तर गळ्याला खिळ्यांचे पट्टे बांधून काम करत आहेत. अत्यंत भयावह परिस्थितीत असलेल्या स्थानिकांनी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र अचानक बिबट्यांचे हल्ले का वाढलेत, त्याचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून.

गेल्या काही दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या दहशतीनं प्रचंड भीती पसरली आहे. भरदिवसा हे बिबटे माणसांसह पाळीव प्राण्यांवर हल्ला करू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, खेडसह जुन्नर या पट्ट्यात बिबट्यांची संख्या वाढली आहे. थेट मानवी वस्तीत शिरकाव करून बिबटे हल्ले करत असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अचानक बिबट्यांचे हल्ले का वाढलेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

तर या परिसरात कुकडी प्रकल्पातील 5 धरणांमुळे बारमाई शेतीसाठी पाणी उपलब्ध असतं. त्यामुळं ऊस शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. परिणामी बिबट्यांना लपण्यासाठी उसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. तर भक्ष म्हणून शेतकऱ्यांकडून नुकतेच जन्मलेले जर्सी गाईचे गोरे खोड मोकाट सोडले जातात. याचाच भक्ष म्हणून बिबटे उपयोग करतात. एकीकडे दुधाला बाजार भाव नाही तर दुसरीकडे हे खोंड सांभाळून याचा काही उपयोग होत नाही त्यामुळे शेतकरी हे खोंड मोकाट सोडून देत आहेत.

गोहत्या बंदीमुळे या गोऱ्यांना कत्तलीसाठी कुणी घेऊन जात नसल्यानं शेतकरी असे मोकाट सोडून देतात. त्यामुळे या परिसरात बिबट्यांची संख्या वाढली असून शासनाने या संदर्भात तातडीनं उपाययोजना करून गोहत्या बंदीसंदर्भातला विचार करून या गोऱ्यांना सांभाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी विनंती शेतकरी आता शासनाकडे करत आहेत.

तर शेतकऱ्यांनी असे गोरे मोकाट सोडून देण्याऐवजी वनविभागाशी संपर्क केला तर या गोऱ्यांचा भक्ष्य म्हणून पिंजऱ्यामध्ये ठेवण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. बिबट्याला पकडण्यासाठी डार्टचे इंजेक्शन देण्यासाठी भक्ष म्हणून या गोय्रांचा उपयोग होऊ शकतो असं वनविभागानं म्हटलं आहे.

बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी या भागातील मजूर महिला गळ्यात पट्टे बांधून शेतात काम करत आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसर दहशतीत आहे. आता तरी वनविभाग आणि सरकारनं याची दखल घ्यावी आणि तातडीनं बिबट्यांचा बंदोबस्त करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

FAQ

1. पुणे जिल्ह्यात बिबट्यांची दहशत नेमकी कुठे वाढली आहे?

मुख्यतः उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर या भागांमध्ये बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे. हे बिबटे आता मानवी वस्तीतही शिरत असून शेतकऱ्यांवर आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहेत.

 2. अचानक बिबट्यांचे हल्ले का वाढले आहेत?

या परिसरात कुकडी प्रकल्पातील पाण्यामुळे ऊस शेती मोठ्या प्रमाणात होते. उसाच्या शेतांमध्ये बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळते.
तसेच, शेतकऱ्यांकडून मोकाट सोडले जाणारे जर्सी गाईंचे गोरे खोंड बिबट्यांचे सोपे भक्ष्य ठरतात. त्यामुळे बिबट्यांचे वावरणे वाढले आहे.